नवी दिल्ली : अरबी समुद्रात घोंघावत असलेले ‘वायु’ चक्रीवादळ उत्तरेकडे ताशी 15 किलोमीटर वेगाने सरकत असून येत्या गुरुवारी सकाळी गुजरात किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

पोरबंदर आणि महुवा दरम्यान वेरावळ परिसरातल्या किनारपट्टीवर हे वादळ धडकण्याची शक्यता असून यावेळी ताशी 110 ते 135 किमी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज असून यामुळे सौराष्ट्र आणि कच्छ परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात ताशी 70 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. या काळात समुद्र खवळलेला राहील. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.