६७ लाख ४५ हजार ४०० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई : राज्यात १ ते २६ मे पर्यंत ८३० शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे २८ लाख ३७ हजार ७९४ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच राज्यातील ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांमधून १ ते २६ मेपर्यंत  राज्यातील १ कोटी ४६ लाख १५ हजार १७० शिधापत्रिका धारकांना ६७ लाख ४५ हजार ४००  क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे.  या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे १९ लाख ९४ हजार २६१ क्विंटल गहू, १५ लाख ३२ हजार २१६ क्विंटल तांदूळ, तर  २१ हजार २८४  क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ४ लाख ७ हजार ४२७ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे. त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रतिलाभार्थी प्रतिमहिना ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. ४ मे पासून एकूण १ कोटी ९ लाख ६२ हजार ७३४ रेशनकार्ड ला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील ४ कोटी ९२ लाख १४ हजार  ५८४ लोकसंख्येला २४  लाख ६०  हजार ७३० क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.

राज्य शासनाने कोविड-१९ संकटावरील उपाययोजनेसाठी ३ कोटी ०८ लाख ४४ हजार ०७६ एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून २०२० या २ महिन्यासाठी प्रति व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप दि.२४ एप्रिल २०२० पासून सुरू होऊन आता पर्यंत ७ लाख ५८ हजार १९० क्विंटल धान्याचे वाटप केले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रति रेशनकार्ड १ किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे ५३ हजार ३५१  क्विंटल  डाळीचे वाटप केले आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येत आहे.