मुंबई : राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचे निकष व कार्यपद्धती सुधारण्यासाठी तसेच हे पुरस्कार सर्व खेळांचा समावेश असणारे असावेत, याबाबत अभ्यास करण्यासाठी पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यीय समिती गठित करण्यात आली असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याणमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली गठित झालेल्या या समितीमध्ये अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, जलतरण सहसंचालक जयप्रकाश दुबळे, योग प्रशिक्षक अरूण खोडसकर, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदिप गंधे, जिमनॅस्टिक मधील आंतरराष्ट्रीय पंच वर्षा उपाध्ये, गिर्यारोहक प्रशिक्षक ऋषिकेश यादव, पॅरा ऑलिंपिक असोसिएशनचे उपाध्यक्ष राजाराम घाग, बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड, अर्जुन पुरस्कारप्राप्त तेजस्विनी सावंत आणि विशेष निमंत्रित म्हणून मनोहर साळवी अशा ११ सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे.

क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींना राज्य शासनातर्फे दरवर्षी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या पुरस्कारांमध्ये ऑलिंपिक,कॉमनवेल्थ, एशियन गेम्स व्यतिरिक्त अन्य खेळांचाही समावेश व्हावा अशी मागणी गेली अनेक वर्षे करण्यात येत होती. या पुरस्कारांसाठी आजपर्यंत केवळ 39 क्रीडा प्रकार विचारात घेतले जात होते. परंतु समाविष्ट न करण्यात आलेल्या खेळ प्रकारांचाही यामध्ये समावेश व्हावा तसेच सर्व क्रीडा प्रकारांना सर्वसमावेशक हे पुरस्कार असावेत अशी क्रीडाप्रेमींची मागणी होती. ऑलिंपिक खेळातील पुरस्कार चक्राकार पद्धतीने दिले जात होते. त्याऐवजी ऑलिंपिक खेळांना प्रतिवर्षी पुरस्कार दिला जावा, गिर्यारोहणामध्ये शिखराची उंची निश्चित करावी, क्रीडा संघटक आणि एकलव्य पुरस्कारांबाबत सूचना, पॅरा ऑलिंपिकमध्ये असलेल्या सर्व खेळांचा शिवछत्रपती पुरस्कारामध्ये समावेश करण्यात यावा, अशा काही मागण्या क्रीडा विभागाकडे आल्या होत्या.

क्रीडा पुरस्काराची  सर्व प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी स्पोर्ट पोर्टल अद्ययावत करावे अशी सूचनाही वारंवार क्रीडा प्रेमींकडून सरकारला प्राप्त झाली होती. या सर्व बाबी विचारात घेऊन शालेय शिक्षण व क्रीडामंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या पुरस्काराबाबत तज्ज्ञांची समिती गठित करण्याचे निर्देश 25 जुलै रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला दिले होते. त्यानुसार आज समिती गठित करण्यात आल्याचे ॲड. आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे.या समितीला आपला अहवाल देण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.