नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेड इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयाबरोबर ऑस्ट्रेलियानं चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतानं कालच्या १ गडी बाद ९ या धावसंख्येवर आपला दुसरा डाव पुढे सुरु केला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या जॉश हेजलवूड आणि पॅट कमीन्स या जोडगोळीसमोर भारताची फलंदाची गडगडली.

हेजलवूडनं ५ तर कमीन्स यानं ४ गडी बाद केले, यामुळे दुसऱ्या डावात भारत ९ गड्यांच्या मोबदल्यात केवळ ३६ धावाच करू शकला. महम्मद शमी जायबंदी झाल्यानं त्याला मैदानातून निवृत्त व्हावं लागलं. यामुळे भारताला पहिल्या डावातली ५३ धावांची आघाडी मिळून ऑस्ट्लीयासमोर विजयासाठी केवळ ९० धावांचं आव्हान ठेवता आलं.

यानंतरचा दुसरा कसोटी सामना येत्या २६ डिसेंबरला मेलबर्न इथं सुरु होईल.