मुंबई : देशात नोंदणी करण्यात आलेल्या एकूण 21 हजार 548स्टार्टअपपैकी सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण 8हजार 402 स्टार्टअप्सची नोंदणी करण्यात आलेली आहे.

शिक्षण आणि कौशल्य, आरोग्य सेवा,शेती, प्रदूषण विरहीत ऊर्जा, जल व कचरा व्यवस्थापन, प्रशासन,सर्वसमावेशक आर्थिक विकास या विविध क्षेत्रातील स्टार्टअपना राज्य शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. महाराष्ट्रात स्टार्ट अप योजनांना चांगला प्रतिसाद मिळत असून आता अधिकाधिक युवा वर्ग स्टार्ट अपकडे वळत आहे.

राज्यातील संसाधनाचा उपयोग करण्यासाठी स्टार्टअप काम करत आहेत. सर्वाधिक स्टार्टअप राज्यात येत असून येणाऱ्या काळात महाराष्ट्र ही आघाडी टिकवून ठेवेल. उद्योग क्षेत्राला चालना मिळावी यासाठी,महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीने स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यात येत आहे. स्टार्टअपमुळे इच्छुकांना थेट शासनासोबत काम करण्याची संधी मिळते.

स्टार्ट अपच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान तसेच नवनवीन संकल्पनांवर आधारित नवीन उद्योजक महाराष्ट्रात घडावेत यासाठी स्टार्ट अपला प्रोत्साहन देण्यात येत आहे. याशिवाय शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातही उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी  स्टार्टअप सप्ताह/ स्टार्टअप यात्रा यासारखे उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र स्टार्टअप वीक अंतर्गत निवडण्यात येणाऱ्या 24 स्टार्टअप विजेत्यांना 15 लाख रुपयांचे राज्य शासनाच्या कामकाजाचे कार्यालयीन आदेश आणि एक उपयुक्त विभागाबरोबर काम करण्याची संधी मिळते. जून 2018 आणि जानेवारी2019 मध्ये महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह आयोजित करण्यात आला होता. 2स्टार्टअप वीकच्या 48 विजेत्यांचे पायलट प्रोजेक्ट राज्य शासनाच्या विविध विभागांबरोबर चालू आहेत.