नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर तिथल्या नागरिकांनी काबूल विमानतळावर काल प्रचंड गर्दी केली; त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. तिथली बहुतेक सर्व व्यावसायिक उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. भारत सरकार काबुलमधल्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि तिथून भारतात परतण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची अस्वस्थता आपल्याला कळत आहे असे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे. सध्या विमानतळावरील व्यवहार हे सर्वात मोठे आव्हान आहे आणि याबाबत मित्रराष्ट्रांशी चर्चा सुरू आहे. तिथे असलेल्या भारतीयांबद्दल अचूक माहिती मिळणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याबाबतची सर्व माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या अफगाणिस्तानच्या विशेष संपर्क क्रमांकावर आणि ईमेलवर द्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. भारत सरकार काबुलमधल्या शीख आणि हिंदू नागरिकांच्या सातत्याने संपर्कात असून त्यांच्या हिताला सरकारचे पहिले प्राधान्य असेल असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीबाबत भारताच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक काल झाली; संयुक्त राष्ट्र अफगाणिस्तानाच्या नागरिकांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनिओ गुटेरस यांनी यावेळी दिली.