नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व विद्यमान आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी कायदे निःपक्षपणे राबवणे, हाच दहशतवादाचा मुकाबला करण्याचा एकमेव मार्ग आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. ते उझवेकिस्तानात ताश्कंद इथं एस. सी. ओ. अर्थात शांघाय सहकार्य संघटना परिषदेच्या बैठकीत बोलत होते.

दहशतवादामुळे सामाजिक ऐक्यात तसंच विकासकामांत सातत्यानं अडथळे येत असून, एस. सी. ओ. देशांनी याविरोधात एकत्र येणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. रशियात ओरेनबर्ग इथं एस. सी. ओ. ची संयुक्त लष्करी कवायत आयोजित केल्याबद्दल सिंग यांनी या देशाचं अभिनंदन केलं आहे.

जागतिक व्यापार संघटनेसोबत पारदर्शी, नियमाधारीत, खुली, सर्व समावेशक आणि भेदभावरहीत बहुस्तरीय व्यापारी प्रणाली कायम राखण्यासाठी भारत कटीबद्ध आहे, असंही सिंग यांनी म्हटलं आहे.