नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात बीपीसीएलच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी सध्याची स्वारस्य पत्र प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविडचं जागतिक संकट आणि सध्याच्या भू -राजकीय परिस्थितीचा अनेक उद्योगांवर, विशेषतः तेल आणि वायू उद्योगांवर परिणाम झाला आहे. जागतिक ऊर्जा बाजारातल्या सध्याच्या परिस्थितीमुळे, बहुसंख्य पात्र इच्छुक पक्षांनी BPCLच्या निर्गुंतवणुकीची सध्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळं BPCL ची धोरणात्मक निर्गुंतवणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबतचा निर्णय परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य वेळी घेतला जाईल, असं गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागानं म्हटलं आहे.