आठ प्रवासी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 3997 प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. या मध्ये 18 प्रवासी हे  महाराष्ट्रातील आहेत.  यातील आठ प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये मुंबईतील 5 प्रवाशांना कस्तुरबा रुग्णालयात, पुण्यातील नायडू रुग्णालयात 2 प्रवाशांना तर नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका प्रवाशास भरती करण्यात आले आहे. यापैकी मुंबईतील 3 प्रवाशांचे प्रयोगशालेय नमुने निगेटिव्ह आल्याचे एन आय व्ही, पुणे यांनी कळविले आहे. या सर्व प्रवाशांचे नमुने एन आय व्ही पुणे येथे पाठविण्यात आले असून उर्वरित प्रवाशांचे प्रयोगशाळा निदान उद्यापर्यंत प्राप्त होईल. मात्र राज्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत चीन आणि विशेष करुन वुआन प्रांतातून आलेल्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जात आहे. दि. 1 जानेवारी पासूनच्या प्रवाशांची यादी विमानतळ प्राधिकरणाकडून घेण्यात येत असून त्यातील महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या प्रवाशांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात येत आहे. त्यांना सर्दी, ताप वा तत्सम लक्षणे आढळली आहेत का ? किंवा कुटुंबातील सदस्यांना जाणवत आहे का याबाबत विचारणा केली जात आहे.

महापालिका क्षेत्रातील अशा प्रवाशांशी महापालिकेचे आरोग्य अधिकारी संपर्क साधतील  तर ग्रामीण भागातील प्रवाशांना आरोग्य विभागाचे अधिकारी दूरध्वनीवरुन संपर्क साधतील.

महाराष्ट्रात आजमितीस करोना व्हायरसचा धोका मोठ्या प्रमाणावर नाही. मात्र, आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास त्यास तोंड देण्यासाठी यंत्रणेने पूर्वतयारी केली आहे. ‘करोना’ रुग्णांसाठी मुंबईत कस्तुरबा आणि पुणे येथे नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्ष आहेत.