‘धर्मनिरपेक्षता’ ही संकल्पनाच रद्द करण्याचा कुटील डाव ; डॉ. सुषमा अंधारे

पिंपरी : एनआरसी सर्व्हेला घरी येणा-या अधिका-यांना आपले कागदी पुरावे देण्याअगोदर त्यांना पुढील प्रश्न विचारा, तुमचे सरकार आमच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करणार होते, त्याचे काय झाले? मेक इन इंडियाचे काय झाले? देशाचा जीडीपी वाढणार होता त्याचे काय झाले? तुम्ही चहा विका पण एअर इंडिया, रेल्वे, एलआयसी विकायचे ठरले नव्हते. पंतप्रधान मोदी-गृहमंत्री शहा तुम्ही तर चहा बरोबर देशही विकायला काढला आहे. तुमचा हा नाकर्तेपणा झाकण्यासाठी तुम्ही सीएए, एनआरसी, एनपीआरच्या (CAA, NRC, NPR) च्या कागदी घोड्यात नागरिकांना अडकवू पहात आहेत.

देशाची ‘धर्मनिरपेक्षता’ ही संकल्पनाच रद्द करण्याचा आणि ‘संविधानात’ हवा तसा बदल करण्याचा कुटील डाव भाजप सरकारने रचला आहे. हे हाणून पाडण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र यावे असे आवाहन डॉ. सुषमा अंधारे यांनी केले.
शुक्रवारी सीएए, एनआरसी, एनपीआरच्या (CAA, NRC, NPR) विरोधात संविधान बचाव समिती, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या सभेत डॉ. सुषमा अंधारे बोलत होत्या.

तत्पुर्वी सीएए, एनआरसी, एनपीआरच्या (CAA, NRC, NPR) विरोधात संविधान बचाव समिती, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने निगडीतील भक्ती शक्ती चौकातून पुणे – मुंबई महामार्गाने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यंत हजारो नागरिकांनी तिरंगा रॅली काढली. या रॅलीचे डॉ. आंबेडकर पुतळा चौकात सभेत रुपांतर झाले. यावेळी उलेमा कौन्सिल पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मौलाना फैज अहमद फैजी, कुलजमाती तंजीमचे मार्गदर्शक मौलाना अब्दुल गफार अशरफी, मौलाना नय्यर नूरी, मौलाना अलीम अन्सारी, हाजी गुलाम रसुल, एस. अझीम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर तसेच प्रताप गुरव, डॉ. सुरेश बेरी, धम्मराज साळवे, संतोष जोगदंड, ॲड. मनिषा महाजन, कॉ. गणेश दराडे, हाजी युसूफ कुरेशी, मौलाना अब्दुल गफार, कारी इक्बाल उस्मानी, मनोहर पद्मन, राम नलावडे, विशाल जाधव, कपील मोरे, संजय बनसोडे, चंद्रकांत यादव, गोकूळ बंगाळ, सुधीर मुरुडकर आदींसह हजारो नागरिक उपस्थित होते.

डॉ. अंधारे म्हणाले की, मोदी – शहा हे महात्मा गांधी यांच्या भाषणांचे अशोक वाजपेयी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा दाखला देतात. पण ते अर्धवट सांगतात. त्यातील महात्मा गांधींची पुर्ण भाषणे त्यांनी जनतेला सांगावी. मत मागताना महात्मा गांधींचे दाखले देता आणि निवडणूक संपताच महात्मा गांधींच्या प्रतिमेला गोळ्या घालता, हा तुमचा कसला राष्ट्रवाद. असा प्रश्न डॉ. अंधारे यांनी भाजपा सरकारला विचारला. सीएए, एनआरसी, एनपीआरचा त्रास अल्पसंख्यांक पेक्षा भटक्या जाती जमातीच्या लोकांना जास्त होणार आहे. दहा पंधरा वर्षापुर्वी ग्रामिण भागात अनेक महिलांची प्रसूती घरी होत होती. त्या महिला, ते कुटूंब जन्म नोंदणीचे दाखले कसे आणणार. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समर्पित केलेल्या भारतीय संविधानात कलम 14 प्रमाणे कोणत्याही भारतीय नागरिकाला जात, धर्म, वंश, भाषा, लिंग, प्रांत याच्या आधारावर नागरिकत्व नाकारण्याची तरतूद नाही.

1955 च्या नागरिकत्व कायद्यानुसार जी व्यक्ती त्या देशात जन्मली किंवा ज्या व्यक्तीचे वास्तव्य गेली 11 वर्षे भारतात आहे. अशा व्यक्तीला भारताचे नागरिकत्व देण्यात येते. यामध्ये धर्माच्या आधारावर कोणताही जातीभेद केला जात नाही. म्हणूनच भारत देश जगातील सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष देश आहे. देशाची ‘धर्मनिरपेक्षता’ ही संकल्पनाच रद्द करण्याचा आणि ‘संविधानात’ हवा तसा बदल करण्याचा कुटील डाव भाजप सरकारने रचला आहे. हे हाणून पाडण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र यावे. असे आवाहन डॉ. सुषमा अंधारे यांनी केले.

तुम्ही कितीही भडकविले तरी आम्ही अहिंसेनेच एनआरसी विरोधातला लढा लढू आणि आम्ही जिंकूच. सीएए, एनआरसी, एनपीआर साठी खर्च करण्यापेक्षा चांगल्या शिक्षण संस्था उभारा, शिक्षण आरोग्यासाठी जास्त निधीची तरतूद करा, सच्चर कमिशनची अंमलबाजवणी करा अशी मागणी डॉ. अंधारे यांनी यावेळी केली.