मुंबई : शीतपेय आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या कंपन्या रिकाम्या बाटल्यांचे बाजारातून एकत्रीकरण करून पुनर्निमाण करीत आहेत. याचे प्रमाण ३० ते ४० टक्के असून, हे प्रमाण १०० टक्के करण्यासाठी संबंधित कंपन्यांनी तातडीने उपाययोजना आखाव्यात, अन्यथा संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले.

रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांचे एकत्रीकरण करून त्याचे पुनर्निमाण करण्यासंदर्भात बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री कदम बोलत होते. या बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रविंद्रन, बिस्लेरी,पेप्सिको, कोकाकोला अशा एकूण ३० कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. कदम म्हणाले, प्लास्टिक बाटल्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी त्या बाजारातून एकत्रीकरण करून त्यांचे पुनर्निमाण करणे गरजेचे आहे. ज्या हॉटेलमध्ये कंपन्या आपल्या बाटल्यांचे वितरण करीत आहेत, तिथे एकत्रीकरण करण्याचे केंद्र सक्तीने उभारावे. समुद्र,पर्यटनस्थळ, किल्ले तसेच जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय एक केंद्र उभारणे सक्तीचे आहे. यापूर्वीही या कामासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र,१०० टक्के ही केंद्रे उभारण्यात आली नसून, ज्या कंपन्यांनी एक वर्ष मुदत देऊनही उपाययोजना केलेल्या नाहीत अशा कंपन्यांना कारवाईच्या तातडीने नोटीस देण्यात याव्यात असेही श्री. कदम यांनी यावेळी संबंधितांना सांगितले.