नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बातम्यांची सत्यता तपासण्याचं  कौशल्य असणाऱ्या पारंपरिक माध्यमांनी, समाजातल्या आपल्या भूमिकेसंदर्भात आत्मपरीक्षण करावं आणि वाचकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी मार्ग शोधायला हवेत असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं.

इंग्रजी वर्तमानपत्र हिंदूनं आज बंगळुरात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. इंटरनेट आणि समाजमाध्यमांनी पत्रकारितेचं लोकशाहीकरण आणि पुनरुज्जीवन केलं. मात्र यामुळे समाजात चिंताही वाढल्या आहेत, असं राष्ट्रपती म्हणाले.

माध्यमांचं हे नवं रूप वेगानं लोकप्रिय झालं मात्र पारंपरिक माध्यमांमध्येच बातम्यांची सत्यता पडताळण्याचं कौशल्य आहे, असं राष्ट्रपती म्हणाले. भेदभाव रहित पत्रकारितेच्या माध्यमातून पारंपरिक माध्यमांनी नागरिकांना माहिती द्यावी असं आवाहन त्यांनी केलं.