मुंबई :  ना.म जोशी मार्गावरील  बीडीडी चाळीतील ज्या रहिवाशांनी पुनर्विकासाच्या कामासाठी घरे मोकळी करून दिली अशा 260 रहिवाशांना  म्हाडामार्फत 15 मार्च 2020 रोजी काढण्यात येणाऱ्या सोडतीमध्ये नवीन घरे दिली जावीत अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज बीडीडी चाळीसंदर्भात बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

ना.म.जोशी मार्गाच्या बीडीडी चाळीतील 800 पैकी 260 रहिवाशी पहिल्या टप्प्यात संक्रमण शिबिरात (ट्रान्झिट कॅम्प) स्थलांतरित झाले. उर्वरित रहिवाशांनी अजून घरे रिकामी केली नाहीत.  जे 260 रहिवासी घरे रिकामी करून संक्रमण शिबिरात स्थलांतरित झाले होते, त्यांच्यासाठी सोडत काढून त्यांना  ॲग्रीमेंट्सह नवीन घरे द्यावीत. असे केल्याने उर्वरित रहिवाशांमध्ये विश्वास निर्माण होऊन ते घरे रिकामी करतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प विशेष प्रकल्प म्हणून हाताळला जावा, तसेच या कामाला गती द्यावी अशा सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या. ते म्हणाले, तिथे राहत असलेल्या रहिवाशांमध्ये जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना संक्रमण शिबिरात  स्थलांतरित करावे. या कामासाठी उपजिल्हाधिकारी यांच्या नियुक्तीसह समर्पित भावनेने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची टीम तयार करावी.

ना.म.जोशी मार्गावरील बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाप्रमाणेच  नायगाव, शिवडी आणि वरळी येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला वेग द्यावा. टप्प्यांची निश्चिती करून येथेही काम सुरु केले जावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,  परिवहन मंत्री अनिल परब, खा. अरविंद सावंत, माजी मंत्री सचिन अहिर, यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता व सबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.