मुंबई : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मच्छिमारांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पालघर जिल्ह्यातील आठ जेट्टीपैकी ६ जेट्टींची कामे पूर्ण झाली आहेत. मच्छिमारांच्या विकासात्मक कामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्व.उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य श्रीनिवास वनगा यांनी पालघर जिल्ह्यातील बंदराचा विकास आणि जेट्टींच्या कामांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री श्री.चव्हाण बोलत होते.

श्री. चव्हाण म्हणाले, नाबार्ड आणि मत्स्य व्यवसाय विभागाने निधी उपलब्ध करून ८ पैकी ६ जेट्टींची कामे पूर्ण केली असून, उर्वरित दोन कामे स्थानिकांच्या विरोधामुळे अपूर्णावस्थेत आहेत. तसेच, मुंबईतील माहीम, उपनगरातील मढ, भाटी, मढ धोनीपाग या कामास  झालेल्या विलंबामुळे संबंधितांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील बंदर आणि जेट्टींच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, उर्वरित अपूर्णावस्थेत असलेली कामे निविदा, अटी व शर्तीप्रमाणे करून घेण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री श्री. चव्हाण यांनी दिली.