नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांनी जाणीवपूर्वक बाळगलेल्या मौनाला काय म्हणावं, असा प्रश्न भाजपानं विचारला आहे. दिल्लीत शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याऐवजी हे दोन्ही पक्ष हिंसाचाराच्या घटनेचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.

दिल्लीत सुरू असलेला हिंसाचार तसंच पोलीस आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर झालेल्या हल्ल्याच्या घटनांबाबतही काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं मौन का बाळगलं, असा सवाल त्यांनी केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंसाचारातल्या पीडीतांच्या धर्माचा उल्लेख केल्याबद्दल जावडेकर यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. आम आदमी पक्षाच्या आमदारांनी हिंसाचाराला चिथावणी देण्यापेक्षा शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असं ते म्हणाले.