मुंबई : अनेक चित्रपटांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या जयराम कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ हरहुन्नरी कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री म्हणतात की, कुलकर्णी यांनी कसदार अभिनयाने अनेक भूमिका ना केवळ जिवंत केल्या परंतू त्या अजरामरही केल्या. खणखणीत आवाज, भाषेतील ग्रामीण ढब यामुळे त्यांनी साकारलेल्या पाटील, सरपंच भूमिका कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या. त्यांनी आकाशवाणीसाठी खास ग्रामीण भाषेत केलेले कार्यक्रम श्रोत्यांच्या चांगलेच पसंतीस पडले. आपल्या सादरीकरणातून त्यांनी स्वत:चा एक श्रोतृवर्ग त्यावेळी तयार केला होता. मराठी चित्रपट सृष्टीतील एक ज्येष्ठ तारा आज निखळला.