नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या राष्ट्रपतीच्या अलिकडेच्या चीन दौऱ्यानंतर चीन आणि पाकिस्ताननं जारी केलेल्या संयुक्त निवेदनात जम्मू आणि काश्मीर संबंधात केलेला उल्लेख भारतानं फेटाळला आहे.

जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं आहे. भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये चीनसह अन्य कोणत्याही देशांनी दखल देऊ नये तसंच भारताच सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करावा अशी भारताची अपेक्षा असल्याचं ते म्हणाले.

चीन पाकिस्तान आर्थिक मार्गिकेसंदर्भात भारतानं आक्षेप घेतला असून याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ही मार्गिका पाक व्याप्त भारतात असल्याचं ते म्हणाले. पाक व्याप्त काश्मीरमधील स्थिती बद्दलण्याचा कुठल्याही देशाचा प्रयत्न भारत कदापी खपवून घेणार नाही.