नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : धारावी सारख्या ठिकणी कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. दाट लोकवस्ती असलेल्या वसाहतींमधे प्रशासनानं कडक उपाययोजना अंमलात आणण्यासाठी पावलं उचलण्यास सुरवात केली आहे. सर्व २२७ प्रभागांमधे दारोदारी जावून लोकांची चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.

मनपा अधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांचा समावेश असलेलं पथक प्रत्येक भागात जाणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं  दक्षिण मुंबईमध्ये कुलाबा इथल्या नागरिकांसाठी आजपासून  १ रुपया आरोग्य सेवा सुरु केली आहे.

आज २५० पेक्षा जास्त रुग्णांनी त्याचा लाभ घेतला.कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून  पालघर जिल्ह्यात काल पासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत  पालघर जिल्हा पोलिसांनी  विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या १२० वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल केला असून, ४९८ वाहनं जप्त केली आहेत.