मुंबई : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व प्रशासन यंत्रणा  युद्धपातळीवर कार्यरत आहे. लॉकडाऊनच्या काळात राज्यातील एकही व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोना विरुद्धच्या या लढाईसाठी अन्य विभाग तसेच विविध सामाजिक संस्था प्रशासनासमवेत मोठ्या प्रमाणावर झटत आहेत.

विशेषतः लॉकडाऊनच्या  काळात गोरगरीब, असंघटित कामगार, गरजू  यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था व्हावी. यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणजे भारतीय नौदलाच्या मुंबई विभागामार्फत काही दिवसांपूर्वी  मुसाफिरखाना भागातील गरजूंना मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या  प्रयत्नाने जीवनावश्यक वस्तूंच्या संचाचे वाटप करण्यात आले होते. मुंबई शहर जिल्ह्यातील वाढीव मदतीची गरज लक्षात घेऊन गरजूंना ५ किलो तांदूळ २ किलो तूर डाळ ,१ लिटर तेल अशा जीवनावश्यक वस्तूंच्या जवळपास ७०० संचाचे वाटप नुकतेच नौदलाच्या वतीने करण्यात आले. यातील ५० संच कामाठीपुरा भागात वाटण्यात आले.

यावेळी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे,व इतर अधिकारी उपस्थित होते.