तुकडोजी महाराजांनी सांगितलेली ‘ग्रामगीता’च राज्याला, देशाला विकासाच्या मार्गावर नेईल

मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून दाखवलेला ‘ग्रामोन्नती’चा मार्गच राज्याला आणि देशाला विकासाकडे घेऊन जाईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराजांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण केलं आहे. तुकडोजी महाराज हे कृतीशील संत होते. स्वातंत्र्यलढ्यातल्या सहभागापासून नैसर्गिक आपत्तीच्या काळात लोकांच्या मदतीला धावून जाण्याचं काम त्यांनी केलं. गावखेडी स्वयंपूर्ण व्हावीत, समृद्ध व्हावीत हा त्यांचा ध्यास होता. गावांमध्ये एकता, बंधुता, समता असावी. अज्ञान, अंधश्रद्धा अस्वच्छता, भांडण-तंट्याला कुठेही थारा असू नये, स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी त्यांनी काम केलं. तुकडोजी महाराजांनी सांगितलेली ‘ग्रामगीता’ ही केवळ गावांच्याच नव्हे तर अखिल मानवजातीच्या, विश्वासाच्या कल्याणाचा मार्ग आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दलचा आदर व्यक्त केला.