नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्यातही जिल्ह्यांच्या सीमा सरसकट खुल्या होणार नाहीत. लॉकडाऊन संपल्यानंतरच्या उपाययोजनांबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करून कोविड १९ च्या साथीवर नियंत्रण आणण्याचे निर्देश त्यांनी दिले.  सध्या होत असलेल्या स्थलांतरितांमुळं कोविड १९ चा प्रसार वाढू नये याची खबरदारी घेण्याचेही आदेश त्यांनी दिले.

पावसाळा जवळ आला असल्यानं साथीच्या आणि इतर आजारांचा सामना करावा लागेल. त्यामुळं सर्वत्र वैद्यकीय सेवा विशेषतः खासगी डॉक्टर्सची  सेवा नियमित सुरु होईल यावर भर द्यावा असंही ते म्हणाले.

एकीकडे आरोग्य आणीबाणी आणि दुसरीकडे आर्थिक आणीबाणी ही  तारेवरची कसरत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायही सुरु करावे लागत आहेत मात्र ज्या क्षेत्रात ते सुरु होत आहेत तिथे अधिक काळजी घ्यावी लागेल अशी सूचना त्यांनी केली.

उद्योग विभागाने राज्यातील प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये किती परप्रांतीय मजूर काम करीत होते आणि त्यातले किती त्यांच्या राज्यात परतले आहेत त्याचा आढावा घ्यावा, असंही मुख्यमंत्री म्हणाले.