नाशिक ग्रामीण,नांदेड मध्ये नवीन गुन्हे

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३७९ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.

टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ज्या ३७९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यापैकी १६ गुन्हे अदखलपात्र (N.C )आहेत.

जिल्हानिहाय गुन्हे

त्यामध्ये बीड – ३७, पुणे ग्रामीण – ३०, जळगाव – २६, मुंबई – २१, कोल्हापूर – १६, नाशिक ग्रामीण – १६, सांगली – १४, ठाणे शहर – १३, बुलढाणा – १२, जालना – १२, नाशिक शहर – ११, नांदेड – ११, सातारा – १०, पालघर – १०, लातूर – १०, नागपूर शहर – ९, नवी मुंबई – ९, परभणी – ८, सिंधुदुर्ग – ७, अमरावती – ७, ठाणे ग्रामीण – ७, हिंगोली – ६, गोंदिया – ५, सोलापूर ग्रामीण – ५, पुणे शहर – ४, रत्नागिरी – ४ ,सोलापूर शहर – ४, नागपूर ग्रामीण – ४, भंडारा – ४, पिंपरी- चिंचवड – ४, अमरावती ग्रामीण – ४, चंद्रपूर – ४, अहमदनगर – ४, धुळे – ३, रायगड – २, धुळे – २, वाशिम – २, यवतमाळ – १,औरंगाबाद – १ (एन.सी), यवतमाळ – १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १६२ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १४८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, टीकटॉक विडिओ शेअर प्रकरणी १६ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ७ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, युट्युब) गैरवापर केल्या प्रकरणी ४२ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २०७ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाऊन करण्यात यश आले आहे.

नाशिक ग्रामीण

नाशिक ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील कळवण पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलीस विभागातील  नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या १६ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने व्हाट्सॲपद्वारे धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट विविध व्हाट्सअँप ग्रुपवर शेअर केली होती, त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

नांदेड

नांदेड जिल्ह्यातील वजिराबाद पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे नांदेड जिल्ह्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ११ वर गेली आहे सदर गुन्ह्यातील आरोपीने व्हाट्सॲपद्वारे कोरोना महामारीबद्दल व कोरोनाग्रस्त रुग्णांबद्दल चुकीची माहिती व अफवा पसरविणारे मेसज विविध व्हाट्सॲप ग्रुपवर शेअर केले होते. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

ऑनलाईन व्यवहारात सावध राहा

सध्या लॉकडाउनच्या काळात, सरकारने ऑनलाईन मद्य खरेदीला व डिलिव्हरीला सशर्त परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सायबर विभागामार्फत आवाहन करण्यात येते की, जर तुम्हाला मद्य खरेदी करायचेच असल्यास सदर ॲप किंवा वेबसाईट वापरण्यासाठी सुरक्षित आहे याची  खात्री करा व मगच  वापरा, तसेच कुठल्याही ॲपवर शक्यतो आपला बँक खात्याचा नंबर, डेबिट /क्रेडिट कार्ड नंबर व त्यांचे पिन नंबर सेव करू नका. शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी चा पर्याय ऑर्डर बुक करताना निवडा. जर अशा वेबसाईट किंवा ॲपवर तुम्ही फसविले गेले असाल तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद करा व www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण नोंदवा. केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका.