मुंबई : जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत मिचाओ हारडा यांनी आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. जपानमधील अनेक कंपन्या राज्यात कार्यरत आहेत. त्यांची सद्यस्थिती व येत्या काळात होणाऱ्या विस्ताराबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

नव्याने गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्राने सर्व सुविधांसह पोषक वातावरण तयार केले आहे. गुंतवणुकदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी श्री. देसाई यांनी केले. जपानी कंपन्यांना राज्य शासनाने नेहमीच सहकार्य केले आहे. यापुढेही ते कायम ठेवले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी आदी उपस्थित होते.