दादा सामंत यांच्या नेतृत्व, संघर्षाची नोंद घेतल्याशिवाय राज्याच्या संघर्षमय कामगार चळवळीचा इतिहास अपूर्ण

मुंबई : कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ कामगार नेते दादा सामंत यांच्या निधनाने महाराष्ट्रातील कामगार चळवळीचा संघर्षमय अध्याय संपला आहे. दादांचं नेतृत्वकौशल्य, संघर्षांची नोंद घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या कामगार चळवळीचा इतिहास अपूर्ण आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामगार नेते दादा सामंत यांना श्रद्धांजली अर्पण केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिवंगत कामगार नेते दादा सामंत यांना श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, डॉ.दत्ता सामंत यांच्या झुंजार नेतृत्वाला दादा सामंत यांनी समर्थ साथ दिली. राज्यातील कामगार चळवळ वाढवण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. कामगार कायद्याचा सखोल अभ्यास, कामगार कल्याणाची तळमळ असलेले ते नेते होते. डॉ.दत्ता सामंत यांच्यानंतर दादांनी कामगार चळवळीला नवी दिशा, समर्थ नेतृत्वं दिलं. महाराष्ट्रातील कामगार बांधव त्यांचं योगदान कायम स्मरणात ठेवतील. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.