नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 चा मुकाबला करत असतानाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींनाही समर्थपणे तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगला समन्वय ठेऊन काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. रोगराई पसरु नये यासाठी आधीपासून नियोजन करा, असं त्यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार,आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता, तसंच रेल्वे आणि विविध संरक्षण दलांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

शहरी आणि ग्रामीण भागात कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर खड्डे पडू देऊ नका, पडले तर तत्काळ बुजवा, दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी अन्नधान्य, औषधींचा पुरेसा पुरवठा करा.

विभाग आणि जिल्हावार बैठकांमध्ये डॉक्टर्सना सहभागी करून पावसाळ्यातल्या आजारांबाबत नियोजन करा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.