नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश कोविड १९ शी लढत असताना काँग्रेस त्याचं राजकारण करत असल्याचा आरोप करत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

ते आज नवी दिल्ली इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. भारतानं योग्य वेळी लॉकडाऊन केल्याबद्दल सारं जग प्रशंसा करत असताना काँग्रेस मात्र याबाबत टीका करत आहे, असं ते म्हणाले.

भारतात लॉकडाउन लागू करण्याआधी कोनिड १९ ची रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी तीन दिवसांचा होता, तो आता १३ दिवसावर आला, असं सांगत जावडेकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका खोडून काढली.

आतापर्यंत ३ हजारापेक्षा जास्त रेल्वेगाड्या चालवून ४५ लाख स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यांमधे पोचवलं असल्याची माहिती जावडेकर यांनी यावेळी दिली.