टोळधाडीपासून बचावासाठी कृषी विभागाने उपाययोजना करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश

मुंबई /नागपूर : नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टोळधाडीने शेतीचे नुकसान होत आहे. त्यापासून बचावासाठी कृषी विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, तसेच शेतकऱ्यांनीही सतर्क रहावे, अशा सुचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या.

शनिवारी सायंकाळच्या सुमारास या टोळधाडीने काटोल तालुक्यातील कचारी सावंगा, सोनपूर, गणेशपूर, शेकापूर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले. ही माहिती मिळताच गृहमंत्र्यांनी रात्री साडेनऊ वाजता टोळधाड झालेल्या भागात जाऊन पाहणी केली. तसेच त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने फवारणी तसेच योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जेणेकरून टोळधाडी पासून शेतकऱ्यांचे पीक, फळबागा, भाजीपाला वाचू शकेल वा कमीत कमी नुकसान होईल.

शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी सुद्धा टोळधाडपासून बचाव करण्यासाठी बँड, फटाके यांचे मोठे आवाज करावेत, मोठ्या प्रमाणात धूर करावा, त्यामुळेही टोळधाडीपासून आपण बचाव करू शकतो, असे श्री.देशमुख म्हणाले.

नुकसानीची पाहणी करताना त्यांच्यासोबत कृषी विभाग, महसूल विभाग, याबरोबरच स्थानिक पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.