नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ६ तासात निसर्ग चक्रीवादळ गंभीर स्वरुप धारण करुन महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीवरुन जाईल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

दुपारी पणजीपासून २९० किलोमीटर आणि मुंबईपासून ३८० किलोमीटर अंतरावर हे वादळ आहे. ताशी १३ किलोमीटर वेगाने त्याचा प्रवास सुरू आहे.

राज्याच्या उत्तरेकडील भाग आणि त्याला लागून असलेला गुजरातच्या दक्षिणेकडच्या भागातून हे चक्रीवादळ जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातलं हरिहरेश्वर ते गुजरातच्या जवळ दमण या दरम्यानच्या पट्ट्यातून या वादळाचा मार्ग असू शकतो. ते अलिबागच्या दिशेने येण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. या काळात ताशी १२० किलोमीटर वेगानं वारे वाहू शकतात.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वादळाचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचा आज आढावा घेतला. नागरिकांनी शक्य ती सर्व खबरदारी घ्यावी आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अवलंब करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.