आवश्यक तितक्या गाड्या 24 तासांच्या आता देण्यात येतील, रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांचा पुनरुच्चार

आतापर्यंत 4347 श्रमिक विशेष गाड्या चालविण्यात आल्या असून, 60 लाख लोकांना त्यांच्या गंतव्य स्थानी पोहचवले

नवी दिल्ली : राज्यांच्या आवश्यकतेनुसार श्रमिक विशेष गाड्यांच्या माध्यमातून स्थलांतरित नागरिकांची आरामदायक आणि सुरक्षित ने-आण सुरु ठेवण्यासाठी भारतीय रेल्वे वचनबद्ध आहे.

अंदाजे 60 लाखांहून अधिक लोकांना त्यांच्या मूळ राज्यात नेण्यासाठी भारतीय रेल्वेमार्फत आतापर्यंत 4347 हून अधिक श्रमिक विशेष सेवा चालविण्यात आल्या आहेत. 1 मे 2020 पासून श्रमिक विशेष गाड्या चालविल्या जात आहेत.

भारतीय रेल्वेने राज्य सरकारांना कळविले आहे की, राज्यांकडून मागणी प्राप्त झाल्यानंतर 24 तासांच्या आत ते  श्रमिक विशेष गाड्या उपलब्ध करून देणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारांना विनंती केली आहे की श्रमिक विशेष गाड्यांविषयी त्यांची आवश्यकता सांगावी आणि रेल्वेमार्गाने उर्वरित व्यक्तींच्या प्रवासाची अंदाजित मागणी योग्य प्रकारे पार पाडली आहे का हे निश्चित करावे.

रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांनी 29 मे आणि 3 जून रोजी या विषयावर राज्यांना पत्र लिहिले आणि यावर जोर दिला की “भारतीय रेल्वे, विनंती केल्यानंतर 24 तासातच श्रमिक विशेष गाड्यांची इच्छित संख्या त्वरित प्रदान करेल”. आज राज्यांच्या मुख्य सचिवांना याच विषयावर पत्र पाठविण्यात आले आहे.

भारतीय रेल्वेनेही असे आश्वासन दिले आहे की भविष्यातही कोणतीही आवश्यकता भासल्यास अतिरिक्त श्रमिक विशेष गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. अगदी कमी कालावधीत केलेल्या विनंतीनुसार दिलेल्या अंदाजानुसार किंवा त्यापेक्षा जास्त उद्भवू शकणार्‍या कोणत्याही अतिरिक्त मागणीची पूर्तताही केली जाईल.

सर्वोच्च न्यायालयाने, 28 मे 2020 च्या आपल्या आदेशात इच्छुक स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ ठिकाणी परत जाण्यासाठी निर्देश जारी केले आहेत. आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी भारतीय रेल्वे आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे.