२७ लाख ६८ हजार ७०० क्विंटल अन्नधान्याचेही वाटप

मुंबई : राज्यातील ५२ हजार ४३८ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे १ जून ते १६ जूनपर्यंत राज्यातील ८१ लाख २७ हजार ८६९ शिधापत्रिका धारकांना २७ लाख ६८ हजार ७०० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले तसेच १६ लाख ३३ हजार ६६४ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यात ‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने’अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे.  या लाभार्थ्यांना ५२ हजार ४३८ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे ११ लाख २ हजार ७२५ क्विंटल गहू, ८ लाख ४९ हजार ८०९ क्विंटल तांदूळ, तर ११ हजार ६३९ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात  अडकलेल्या सुमारे २ लाख १३ हजार ५४ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलिटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने’अंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रति लाभार्थी प्रति महिना ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि.१ जूनपासून एकूण २५ लाख १८ हजार ६५३ रेशनकार्डला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्डवरील १ कोटी ८ लाख ५५ हजार ३९४ लोकसंख्येला ५ लाख ५९ हजार ४८० क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.

राज्य शासनाने कोविड-१९ संकटावरील  उपाययोजनेसाठी ३ कोटी ८ लाख ४४ हजार ०७६ एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून २०२० या २ महिन्यासाठी प्रति व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे जून २०२० मध्ये आतापर्यंत २ लाख २८ हजार ५० क्विंटल वाटप केले आहे.

‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने’त प्रति रेशनकार्ड १ किलो मोफत तूर किंवा चणा डाळ देण्याची योजना  आहे. या योजनेतून सुमारे १ लाख ३९ हजार ६०९ क्विंटल डाळीचे वाटप केले आहे.

‘आत्मनिर्भर भारत’ या योजनेच्या अन्नधान्य लाभ मे व जून २०२० या २ महिन्यासाठी असून त्या अंतर्गत ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने’मध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ दिला जात आहे आतापर्यंत २८ हजार ६४० क्विंटल मोफत तांदूळ वितरित केला आहे.

राज्यात १ जून ते  १६ जूनपर्यंत ८४६ शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे १६ लाख ३३ हजार ६६४ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच एप्रिल ते जून या कालावधीत ७४ लाख १७ हजार ४४१ शिवभोजन थाळ्या वाटप झाल्या आहेत. राज्यात काळाबाजार करणाऱ्या रेशन दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.