नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मतेला बाधा पोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुणालाही भारत चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. ते आज मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित व्हीडीओ कॉन्फरन्समधे बोलत होते.

काल चीनशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांना त्यांनी आदरांजली वाहिली. या जवानांचं बलिदान वाया जाणार नाही, असं ते म्हणाले. भारत हा शांतताप्रिय देश आहे, शेजारी देशांशी सहमतीनं मार्ग काढण्यावर भारताचा भर असतो.

या भागात शांतता नांदावी, यासाठीच आम्ही प्रयत्नशील असतो. मात्र, कुणी आगळीक केलीच तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठीही तयार असतो, असं मोदी म्हणाले. यावेळी प्रधानमंत्र्यांसोबत या बैठकीत सहभागी झालेल्या मुख्यमंत्र्यांनी उभं राहून दोन मिनिट शांतता पाळून शहीद जवानानंना आदरांजली वाहिली.