नवी दिल्‍ली : कोविड  १९ च्या  संसर्गामुळे आतापर्यंत  राज्य पोलीस दलातल्या ३ अधिकाऱ्यांसह  एकूण  ६० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून  यापैकी ३८ जण मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. राज्य पोलीस दलाच्या एका अधिकाऱ्यानं आज ही माहिती दिली.

आतापर्यंत राज्यातल्या एकूण ४ हजार ९०० पोलिसांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असून त्यापैकी २ हजार ६०० जण मुंबई पोलीस दलात आहेत, तर आतापर्यंत ३ हजार ७०० पेक्षा जास्त पोलीस उपचारानंतर कोरोनमुक्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यात टाळेबंदी लागू झाल्यापासून नियमभंगाच्या  एकूण १ लाख ३९ हजार ७०२ प्रकरणांची नोंद झाली असून २९ हजार ४२५ नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं ते म्हणाले. पोलिसांवर हल्ल्याच्या एकूण २९०, तर आरोग्य सेवकांवर हल्ल्याच्या  ५४ घटनांची नोंद झाली असून या प्रकरणी एकूण ८६० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर नियमभंगाच्या विविध प्रकरणांमध्ये पोलिसांनी एकूण ९ कोटी ९५ लाख दंड वसूल केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली.