नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि युरोपीय समुदाय यांच्या दरम्यान आज 15 वी शिखर परीषद सुरू होत आहे. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून ही परिषद होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह युरोपीय कौन्सिलचे अध्यक्ष चार्लस मायकेल आणि युरोपीय कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन-डर-लेन हे परीषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार आहेत.

या परिषदेमध्ये भारत आणि युरोपिय समुदाय यांच्यातील राजकीय, सुरक्षा संबंध, व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य या मुद्द्यांचा आढावा घेतला जाणार आहे. तसंच, कोरोना संसर्गाची परिस्थितीबाबतही यावेळी चर्चा होणं अपेक्षित आहे.

भारत आणि युरोपीय समुदाय यांच्यातील परिषदेच्या पार्श्वभूमीवर युरोपीय समुदायाचे भारतातील प्रतिनिधी राजदूत उगो अस्तुतो यांच्याशी आकाशवाणीनं संवाद साधला. कोरोना नंतरच्या जगात भारताची महत्वाची भूमिका असेल असं ते यावेळी म्हणाले. पुढील काळात भारत आणि युरोपीय समुदाय यांच्यात दृढ संबंध निर्माण होण्यासाठी अधिक सहकार्य वाढवण्यावर या परिषदेत भर दिला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.