उर्वरित मदत वाटपाचे कामही तातडीने आणि व्यवस्थित पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबांना नुकसानभरपाई देण्याचे काम व्यवस्थित सुरू आहे यावर समाधान व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदतीचे उर्वरित कामही लवकरात लवकर पूर्ण होईल असे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत  आढावा घेण्यासाठी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार , मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, कोकण विभागीय आयुक्त लोकेशचंद्र व संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, रायगड रत्नागिरी व सिधुदुर्गमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले होते. त्या नुकसानग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत देण्यात आली आहे. अद्यापही मदत देण्याचे काम सुरूच आहे. नुकसानग्रस्तांना उर्वरित मदतही तात्काळ देण्यात यावी  यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे.कुठलाही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी असे निर्देश ही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

कोकणात सध्या पाऊस सुरू आहे त्यामुळे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रस्ते वीज पुरवठा मोबाईल कनेक्टिव्हीटी पूर्ववत करण्यात अडचण येत असली तरी या मधील प्रलंबित कामे ही लवकरात लवकर पूर्ण करण्यास प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग  येथे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी तेथील जिल्हाधिकाऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून व राज्य शासनाच्या निधीमधून विशेष  निधी मंजूर करण्यात आला आहे, त्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.

रायगड जिल्हासाठी 372 कोटी 97 लाख 16 हजार, रत्नागिरीसाठी

116 कोटी 78 लाख 69 हजार, आणि सिधुदुर्गसाठी

37 . 19 लाख असे 490 कोटी 13 लाख रुपयांचा निधी देण्यात  आला आहे.

जिल्हा रायगड

१.रायगड जिल्ह्यासाठी रु.३७२.९७ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.

जिल्हा रत्नागिरी

१. रत्नागिरी जिल्ह्यासाठी रु.११६.७८ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.

जिल्हा सिंधुदुर्ग

१. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रु. ३७.१९ लाख  इतका निधी वितरित करण्यात आला आहे.