नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या ७ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. आज मुंबईत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलंय. हे अधिवेशन येत्या ३ ऑगस्टला सुरु होणार होतं.

माक्र कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर ते पुढं ढकललं आहे. मोजक्या आमदारांच्या उपस्थितीत हे अधिवेशन घ्यावं असा प्रस्ताव सरकारनं मांडला होता, मात्र असं करणं, हा त्या आमदारांना संविधानानं दिलेला हक्क हिरावण्यासारखं असल्यानं आम्ही तो नाकारला, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं.

राज्यात शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव आम्ही शिवसेनेला दिलेला नाही आणि शिवसेनेकडूनही तसा प्रस्ताव आलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत जाण्याबाबत  केलेलं विधान हे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल होतं असं फडनवीस म्हणाले.