मुंबई : राज्यातील  52 हजार 413 स्वस्त धान्य दुकानांमधून जुलै  महिन्यात  6 कोटी 64 लाख 23 हजार 346 लाभार्थ्यांना 63 लाख 53 हजार 268 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले  असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब, तसेच एपीएल शेतकरी लाभार्थी अशा रेशनकार्डमधील 7 कोटी 49 लाख नागरिकांपैकी 6 कोटी 64 लाख 23 हजार 346 लाभार्थ्यांना 21 लाख 08 हजार 960 क्विंटल गहू, 16 लाख 25 हजार 109 क्विंटल तांदूळ वाटप करण्यात आले.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो अन्नधान्य (गहू व तांदूळ) मोफत देण्याच्या योजनेमधून  दि. 15 जुलैपासून जुलै महिन्यासाठी आतापर्यंत 26 लाख 19 हजार 199 क्विंटल गहू आणि तांदळाचे वाटप झाले.

स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 3 लाख 81 हजार 407 शिधापत्रिका धारकांमार्फत ते जेथे राहत आहे त्याठिकाणी पोर्टबिलिटी यंत्रणेंतर्गत अन्नधान्याची उचल केली आहे.

आत्मनिर्भर भारत या योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ दिला जातो. आतापर्यंत या योजनेतून 1 लाख 35 हजार 308 क्विंटल तांदूळ वितरित केला आहे.