नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी विद्यापीठ अनुदान आयोग -यूजीसीकडे करणार असल्याचं, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. ते आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. महाविद्यालयाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांसंदर्भात बुधवारी मुख्यमंत्री निर्णय सांगणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनी दिली.

या संदर्भात येत्या दोन दिवसात आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेऊन त्यानंतर हा निर्णय युजीसीला कळवण्यात येईल, असंही ते म्हणाले. विद्यार्थ्यांवर ताण येऊ न देता आणि त्यांनी घराबाहेर न पडता परीक्षा कशी घेता येईल याचा विचार केला जाणार आहे. ही परीक्षा कमी गुणांची असेल असं सूतोवाचही त्यांनी केलं.

राज्यातल्या बहुतांश विद्यापीठांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत तर इतर विद्यापीठांनी १० नोव्हेंबरपर्यंत परीक्षा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. या परीक्षां संदर्भात काल राज्यातल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंबरोबर काल बैठक झाली होती.

विद्यार्थ्यांना या परीक्षेची तयारी करण्यासाठी संपूर्ण सप्टेंबर महिना मिळेल आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतल्या जातील, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निकाल लावला जाईल, अशी माहितीही सामंत यांनी दिली.