मुंबई (वृत्तसंस्था) : नागपूर विभागातल्या पूरग्रस्तांना तातडीनं मदत देण्यासाठी १६ कोटी ४८ लाख २५ हजार रुपयांचा निधी वितरित करायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली.

या निधीतून, पूर परिस्थितीमुळे बाधीत झालेल्या नागरिकांना तातडीनं सानुग्रह अनुदान, पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी मदत त्याचप्रमाणे मदत छावण्यांमध्ये आश्रयाला असणाऱ्या नागरिकांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय देखभाल या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना सहाय्य, जखमी व्यक्तींना मदत तसंच नैसर्गिक आपत्तीमुळे घरं पूर्णतः वाहून गेली असतील किंवा त्यांचं  नुकसान झालेलं असेल तर त्यासाठी सुमारे ८ कोटी ८६ लाख २५ हजार, अंशतः पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी तसंच नष्ट झालेल्या झोपड्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी ७ कोटी १५ लाख रुपये तर मदत छावण्यांसाठी ४७ लाख रुपये दिले जाणार आहेत.

३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत नागपूरसह पूर्व विदर्भात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा फटका अनेक नागरिकांना बसला आहे. पुरामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची घरं पाण्यात बुडाली, त्यामुळे  घरांचं आणि  घरातल्या वस्तूंचं नुकसान झालं.  काही ठिकाणी झोपड्याही नष्ट झाल्या.