नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपला देश सातत्यानं कांदा निर्यात करत आला आहे. निर्यात होणा-या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे. मात्र, केंद्रसरकारच्या आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून असलेल्या प्रतिमेला मोठा धक्का बसतो याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांना करुन दिली.

शरद पवार यांनी आज पियूष गोयल यांची भेट घेऊन राज्यातल्या कांदा उत्पादकांची परिस्थिती विशद केली. तसंच निर्यातबंदीबाबत फेरविचार करावा, अशी विनंती केली. यासंदर्भात वाणिज्य, अर्थ तसंच ग्राहक संरक्षण या तीन्ही मंत्रालयांशी चर्चा करुन पुर्ननिर्णय घेऊ, असं आश्वासन पवार यांना दिलं आहे.