मुंबई (वृत्तसंस्था) : कांद्याचे आयात-निर्यात धोरण हे सर्वस्वी केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे सध्या उद्भवलेल्या कांद्याबाबतच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिले आहे. ते आज नाशिक इथं कांदा व्यापारी आणि शेतकऱ्यांशी बोलत होते.

कांद्याबाबत धोरण ठरवण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारची वेळ मागून लवकरच व्यापारी आणि शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ दिल्लीत नेऊ आणि सरकारची भेट घेऊ, असे त्यांनी सांगितले. शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या किती समस्या असल्या तरी लिलाव व्यवहार बंद ठेवू नयेत, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

शेतकऱ्यांच्या विषयावर सरकारचे धोरण सुस्पष्ट असले पाहिजे, असे पवार म्हणाले. राज्यात ज्यादा दराने कांदा बियाणे विकणाऱ्या कंपन्यांची राज्य सरकार निश्चित दखल घेईल आणि बियाणे कंपन्यांवर कारवाई करेल असेही त्यांनी सांगितले.

आज सकाळी नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर पवार यांनी माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले त्यांच्यासमवेत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार हेमंत टकले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.