मुंबई (वृत्तसंस्था) : शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे नेणारी नवी पिढी घडवणे हे आजच्या घडीचे सर्वात मोठे आव्हान असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आज मुंबईत यशवंतराव चव्हान प्रतिष्ठान इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विज्ञानाची कास धरत समाज घडवण्यासाठी आपले आयुष्य वेचले, आपण सगळ्यांनी याच मार्गावर चालत समाजकारण करायला हवे, असेही ते म्हणाले. आजपर्यंत दिलेल्या सहकार्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.

वाढदिवसानिमित्त देशभरातून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातले मंत्री आणि कार्यकर्त्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.