मुंबई (वृत्तसंस्था) : जमिनीखालील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर झाल्यानं भूजलाची पातळी कमी होत आहे. यासाठी पाणीपुरवठा, कृषी आणि जलसंधारण विभागांनी एकत्र येऊन काम करावं, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

अटल भूजल योजनेचं सादरीकरण त्यांच्या निवासस्थानी झालं. त्यानंतर ते बोलत होते. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणं आणि घरघरात पाणीपुरवठा पोचवणं यासाठी शासन कटीबद्ध असल्याचं ते म्हणाले.

जलसंधारण आणि पुनर्भरणाच्या योजना प्रभावीपणे अंमलात आणाव्यात, शिवकालीन जलसाठ्यांचं पुनरुज्जीवन करावं तसंच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं सर्वसामान्य जनतेला भू-जल स्तर वाढवण्याच्या कार्यात सहभागी करुन घ्यावं, अशा सूचना त्यांनी केल्या. जलयुक्त शिवार योजनेचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.