गहू  व  तांदुळ  प्रत्येकी 2296 क्विंटल तर10 हजार 251 लिटर केरोसिनचे वाटप

पुणे : पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार प्रमाणे ७ कोटी १४ लाख ९५ हजार रुपये वाटप करण्यात आले आहेत. २२ हजार ९६२ कुटुंबांना प्रत्येकी २ हजार २९६ क्विंटल गहू व तांदूळ आणि १० हजार २५१ लिटर केरोसिनचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागात पूरस्थिती निर्माण झाल्यापासून सातत्याने लक्ष ठेवून आहोत. पूरग्रस्तांना लागणारी मदत व करावयाच्या उपाय-योजनाबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात येत आहेत. पुणे विभागाचे आयुक्त म्हणून शासनाने आपणास जे अधिकार दिले आहेत,त्याची ताततडीने अंमलबजावणी करण्यात येत असून आवश्यकते प्रमाणे अधिकारी व कर्मचारी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पाठविण्यात आले असल्याचे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले,दोन्ही जिल्ह्यातील पूरस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तातडीने मदत म्हणून प्रत्येक कुटुंबास ५ हजार रुपये रोख रक्कम देण्यात येत असून उर्वरित रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. आता पर्यंत विभागातील १४ हजार २९९ कुटुंबांना या रकमेचे वाटप करण्यात आले असून उर्वरित पूरग्रस्तांना मदतीच्या वाटपाचे काम सुरूच आहे.

सांगली जिल्ह्यात ३ लाख ११ हजार २२० तर कोल्हापूर जिल्ह्यात ४ लाख ३ हजार ४३५ व्यक्तींचे सुरक्षितस्थळी हलवून त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यातील ४७ बंद रस्त्यांपैकी ३२ रस्ते वाहतुकीसाठी सुरू झाले आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ८८ पैकी ६२ रस्ते खुले झाले आहेत. एसटी वाहतुकीच्या बाबतीत सांगली जिल्ह्यातील बंद ४५ मार्गांपैकी ३७ मार्ग सुरू झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात ३१ पैकी २३ मार्ग सुरू करण्यात आले आहेत.

बँकीग  सेवेच्या बाबतीत सांगली जिल्ह्यात ३२९ एटीएमपैकी २२६ एटीएम सुरु झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात ६४७ पैकी ३२० एटीएम सुरु झाले आहेत. पुरामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. हे काम लगेच  युध्द पातळीवर सुरू करण्यात  आले असून त्याचा परिणाम म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील २४ उपकेंद्र, ३ हजार ९७ रोहित्र व १ लाख ५८ हजार ६५१ बिगर कृषी ग्राहकांचा विद्युत पुरवठा महावितरणने पुर्ववत केला आहे. तर सांगली जिल्ह्यात ११ उपकेंद्र, २ हजार ४९६ रोहित्र व १ लाख २२ हजार ८५३ ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी

मुख्यमंत्री सहायता निधी करिता पुणे विभागातील आयुक्त कार्यालयात आतापर्यंत ६ लाख २५ हजार इतक्या रकमेचे धनादेश विविध संस्था व व्यक्तींकडून प्राप्त झाले आहेत. या व्यतिरिक्त कपडे, बिस्कीट, पाण्याच्या बाटल्या,दूधपावडर आदी जीवनावश्यक साहित्य व वस्तू स्वरूपात प्राप्त होत असून आजपर्यंत सांगलीसाठी ४३ तर कोल्हापूरसाठी ४० ट्रक असे एकूण ८३ ट्रकव्दारे मदतीचे साहित्य पाठविण्यात आले आहेत.

सध्या औषध व उपचाराची आवश्यकता पाहून मोठ्या संख्येने वैद्यकीय पथके पाठविण्यात आली आहेत. सांगली जिल्ह्यात १७४, कोल्हापूर जिल्ह्यात १६९ तर सातारा जिल्ह्यात ७२ अशी एकूण ४१५ वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.

घराच्या पडझडीच्याबाबतीत सर्व्हेक्षणाचे काम सुरू असून प्राप्त माहितीनुसार सांगली जिल्ह्यात पूर्णत: पडझड झालेल्या घरांची संख्या ११ असून १ हजार ८२९ घरांची अंशत: पडझड झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ५८८ पूर्णत: तर ९ हजार ४१३ अंशत: घरांची पडझड झाली आहे. शिवाय ३२७ गोठ्यांची पडझड झाली आहे.

पुणे जिल्ह्यात १७ लाख ५० हजार रुपये ३५० ग्रामीण भागातील कुटुंबांना, सातारा जिल्ह्यातील ५६६ ग्रामीण कुटुंबांना, २८ लाख ३० हजार तर सोलापूर जिल्ह्यातील ३९८ ग्रामीण भागातील कुटुंबांना १९ लाख ९० हजार रुपयांचे ५ हजार रुपये प्रमाणे वाटप करण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यात ग्रामीण भागात ६ हजार ३३५ तर शहरी भागातील २ हजार २३३ कुटुंबांना ४ कोटी २८ लाख ४० हजार रूपयांचे ५ हजार प्रमाणे वाटप झाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग ४ हजार १३० तर शहरी भागातील  २८७ कुटुंबांना 2 कोटी 20 लाख85 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. मदतीच्या वाटपाचे काम अजूनही सुरू असल्याची माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.