नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंत्रज्ञान आणि त्याच्याशी संबंधित अभिनव उपक्रमांचा उपयोग देशाच्या दुर्गम भागातही आर्थिक समावेशकता आणि सामाजिक परिवर्तनासाठी करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रपतींनी आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून डिजिटल इंडिया पुरस्कार २०२० प्रदान केले, त्यावेळी ते बोलत होते. आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका असून, डिजिटल समावेशाने आपलं जीवन अधिक सोपं झालं असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं.

डिजिटल इंडियाच्या संकल्पनेच्या अनुषंगानं प्रथमच डिजिटल इंडिया पुरस्कारांची संपूर्ण प्रक्रिया नामांकनांपासून ते अंतिम पुरस्कार सोहळ्यापर्यंत ऑनलाईन पार पडली. ई गव्हर्नन्समध्ये नवसंशोधन आणि सरकारी सेवा वितरण यंत्रणेच्या डिजिटल परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात.