मुंबई :- देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान योद्धे सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले असून देशवासियांना ‘पराक्रम दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील ‘महापराक्रमी’ व्यक्तिमत्व आहे. आझाद हिन्द सेनेचे नेतृत्व व त्यामाध्यमातून अंदमान निकोबारसारखी बेटं स्वतंत्र करुन त्यांनी गाजवलेला महापराक्रम देशाचा गौरवशाली इतिहास आहे. हा इतिहास आपल्याला सदैव प्रेरणा देईल. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधींजींचं नेतृत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गांधीजींनी अहिंसेच्या मार्गानं तर, नेताजींनी सशस्त्र क्रांतीच्या मार्गानं देशाचा स्वातंत्र्याचा लढा यशस्वी केला. महात्मा गांधीजींनी ‘देशभक्तांचे देशभक्त’ असा नेताजींचा गौरव केला होता, नेताजींनी गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ संबोधून त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधीजींसारख्या नेत्यांच्या कर्तृत्वातून, कोट्यवधी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून देशाला मिळालेले स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखणे, हीच नेताजी सुभाषचंद्र बोस यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेताजींचा गौरव करुन देशवासियांना ‘पराक्रम दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.