नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी राज्यातल्या पाचजणांची निवड झाली आहे.

त्यात शौर्य पुरस्कारासाठी नांदेडच्या कामेश्वर वाघमारे याची, तर क्रीडा पुरस्कारासाठी मुंबईच्या काम्या कार्तिकेयनची निवड झाली आहे. संशोधन क्षेत्रातल्या पुरस्कारासाठी जळगावची अर्चिता पाटिल, सोनित सिसोलेकर, आणि नागपूरचा श्रीनभ अग्रवाल या तिघांची निवड झाली आहे.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांअंतर्गत दरवर्षी विविध क्षेत्रात केलेल्या विशेष कामाबद्दल पुरस्कार दिले जातात.

राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या बालकांनी कोरोनाच्या काळातही आपल्याल्या अद्धूत क्षमतांचा वापर केला अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. मोदी यांनी आज या पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला.

कोणत्याही कल्पनेला योग्य कृतीची जोड मिळाली की त्यातून काहीतरी मोठं आणि प्रभावी घडू शकतं, याचं उत्तम उदाहरण या पुरस्कारांमध्ये दिसते असे ते म्हणाले.या पुरस्कार विजेत्यांच्या यशाने देशभरातल्या असंख्य लोकांना प्रेरणा मिळाली असल्याचं त्यांनी सांगितले.या पुरस्कार विजेत्यांच्या कामागिरीने देशभरातल्या मुलांनाही नक्कीच प्रेरणा मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. जेव्हा एखादी व्यक्ती देशासाठी काम करते तेव्हा, त्याच्या परिणामकारकतेचे अवकाशही वाढते, शिवाय विचार करण्याची पद्धतही तितकीच व्यापक होत जाते असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांची आज घोषणा झाली. यंदा देशभरातल्या ३२ मुलांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. विविध क्षेत्रातल्या उल्लेखनिय आणि अपवादात्मक कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जातात.