नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाराणसी इथे आज चौथ्या अखिल भारतीय वीरशैव मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रिय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य, संमेलनाचे अध्यक्ष शांतितीर्थ स्वामी, स्वागताध्यक्ष स्वामी शिवलिंग शिवाचार्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

वीरशैव मराठी साहित्याच्या अभ्यासकांनी आणि संशोधकानी आपल्या लेखनातील तोच-तोचपणा टाळून इतिहास, दैवतशास्त्र, स्थलमहात्म्य आणि लोकसाहित्य अशा बहुआयामी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन संमेलनाध्यक्ष शांतितीर्थ स्वामी यांनी केले.

साहित्य हे माणसाला अध्यात्माकडे नेणारा मार्ग असल्यामुळे साहित्यिकांच्या योगदानाला महत्व आहे, असे मनोगत संमेलनाचे उद्धाटक माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केले. तत्पूर्वी आज सकाळी संमेलनाची औपचारिक सुरुवात वाराणसी इथं ग्रंथदिंडीने करण्यात आली.