मुंबई– मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनम्र अभिवादन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, “मातोश्री रमाबाई आंबेडकर या प्रेम, त्याग, करुणा, साहस, संघर्षाच्या मूर्ती होत्या. अर्धांगिनी म्हणून त्यांनी डॉ. बाबासाहेबांना भक्कम साथ दिली. ‘महामानव’ म्हणून डॉ. बाबासाहेबांच्या जडणघडणीत माता रमाईंचं योगदान सर्वाधिक आहे. डॉ. बाबासाहेब जीवनभर ज्यांच्या हक्कांसाठी लढले, त्या वंचितांच्या त्या आई होत्या. बाबासाहेबांसारख्या प्रज्ञासूर्याच्या ऊर्जाशक्ती होत्या. माता रमाईंनी जीवनभर संघर्ष केला पण, परिस्थितीला कधीच शरण गेल्या नाहीत. त्यांचं जीवन देशातील कोट्यवधी माता-भगिनींसाठी आदर्श, प्रेरणादायी आहे. करुणामूर्ती, त्यागमूर्ती माता रमाईंची आज जयंती आहे. मी त्यांना विनम्र अभिवादन करतो.”