नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा अर्थसंकल्प हा आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.

काल राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना, अर्थमंत्र्यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढत, या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी केलेल्या तरतुदींचा आढावा घेत, सरकारनं राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

टाळेबंदीमुळे मदतीची गरज असलेल्यांना या अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल, तसंच देशाच्या आर्थिक विकासासाठी सरकारच्या प्रयत्नांना हा अर्थसंकल्प सहायक ठरेल, असा विश्वासही सीतारामन यांनी व्यक्त केला.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेच्या पहिल्या टप्प्याचं कामकाज काल स्थगित झालं. आता येत्या आठ मार्चला अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ होणार आहे.