मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही बिकट झाला असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे.

उद्या सुरु होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.अवैध वाळूची चोरी, पोलीसांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय, कोविड परिस्थितीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, त्या भ्रष्टाचाराची पुस्तिका आम्ही मांडणार आहोत, असं फडनवीस म्हणाले.

महिलांवर अत्याचार वाढले आहेत, इतके ढळढळीत पुरावे असतानाही संजय राठोड यांच्यावर पोलीस कारवाई करत नसतील तर वरिष्ठांचा आशिर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही, असा आरोप त्यांनी केला. शक्ति कायदा हा एक फार्स आहे. जर मंत्री राठोड राजीनामा देत नसतील तर या कायद्याच्या समितीत असलेले आम्ही भाजपा सर्व सदस्य राजीनामे देतोय, असं त्यांनी सांगितले.लोकांमध्ये वीजबीलांमुळे असंतोष आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या इतिहासातलं सर्वात लहान अधिवेशन होतय. कामकाजामधून पळ काढण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले.